Tuesday, April 28, 2015

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (दहा)

असे अनेक बंडू आणि बंडी मला नित्यनेमाने भेटत असतात. प्रश्न फारसे बदलत नाहीत, उत्तरे मात्र अधिकाधिक गुंतागुंतीची (कॉम्प्लेक्स) होत चालली आहेत. जगण्याची गती आणि तऱ्हा बदलते आहे! कलाक्षेत्रातले व्यवहार सुद्धा बदलत आहेत. समाजाच्या दृष्टिकोनातही काही प्रमाणात फरक होतो आहे. मात्र या क्षेत्रातली अनिश्चितता काही बदललेली नाही, बदलण्याची शक्यताही नाही.

यामधला महत्वाचा भाग असा की ज्याक्षणी आपण असं म्हणतो की मी आता पूर्णवेळ अभिनय करणार त्याच क्षणी अभिनय करण्याचं उद्दिष्ट बदललेलं असतं. आता अभिनय हा व्यवसाय झालेला असतो. आणि इथेच गल्लत व्हायला सुरुवात होते. मी एक कलावंत आहे आणि मी काही माझी कला विकायला काढलेली नाही असं म्हणायला आपल्याला आवडतं. पण जेंव्हा मी कला ही गोष्ट व्यवसाय म्हणून स्वीकारतो तेंव्हाच मला विक्रीचा विचार करणं आवश्यक होऊन बसतं. मी माझी कला सादर करण्याचा मोबदला मागणार आहे. आणि तो मोबदला हे माझे जीविताचे साधन आहे हे एकदा मान्य केल्यावर मोबदला घेण्यात कमीपणा वाटण्याचे कारण नाही. खरं तर असं होत असतं की मोबदला तर हवा असतो, पण तरीही मी काहीच विकलेले नाही असा विचार सुद्धा अबाधित राहायला हवा असतो. इंग्रजीमध्ये ज्याला ट्रॅन्झॅक्शन म्हणतात त्यालाच मराठीत देवाण घेवाण म्हणतात! काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही हा व्यवहाराचा नियम आहे. पण कलेचा मोबदला आपण वेगळ्या आणि उच्च पातळीवर ठेवू पहात असतो. त्याला व्यावहारिक मोबदला म्हणायला कचरत असतो. त्यामुळे हा व्यवहार इगोचा होऊन बसतो. माझा इगो सुखावेल अश्या पद्धतीनं मला मोबदला हवा असतो. इगो सुखावला तर त्याला व्यवहार न म्हणता मी माझ्या कलेची कदर म्हणू लागतो. आणि मग घोटाळा व्हायला सुरुवात होते.

कलेच्या या व्यवहारात असणारा एक महत्वाचा फरक म्हणजे कलात्मक अभिव्यक्ती ही काही वस्तू नसते. प्रॉडक्ट नसते. ही माझी वस्तू मी तुम्हाला दिली आणि त्याची किंमत तुम्ही मला द्यायची असा सरळ सोपा व्यवहार इथे नसतो. तसंच ती काही सेवाही नसते. सर्व्हिस नसते! मी तुम्हाला अमुक एक सेवा पुरवली आहे आणि त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मला त्याची किंमत द्यायची असाही हा व्यवहार रहात नाही. कलात्मक अभिव्यक्तिचं समाजाच्या जगण्यातलं स्थान नेमकं काय हे आपलं ठरलेलं नाही. त्यामुळे कलात्मक आस्वादामुळे माझा काय फायदा होतो याचा समाज म्हणून किंवा रसिक म्हणून आपण फारसा विचार करत नाही. दोन घटका करमणूक, मनोरंजन इतपतच त्याची किंमत. त्याचे पैसे तरी किती द्यायचे...! आणि या वातावरणाचा परिणाम कलावंताच्या विचारांवर होत राहतो. अनेकदा अनेक कलावंताच्या कडून ते फसवले गेल्याच्या सुरस कहाण्या आपण ऐकतो. याची परिणीती बहुधा कुणावरच विश्वास न टाकण्यात होत असते. म्हणजे व्यवहार करण्यासाठी दाखवता येईल अशी वस्तू नाही, सेवा नाही, आणि शिवाय फसवणुकीची भीती! म्हणजे अनिश्चिततेची निश्चित शाश्वती!

तसंही कलेचं क्षेत्र खूप अवाढव्य आणि अस्ताव्यस्त आहे. त्यात शिस्त नाही. ती फारशी असूही शकणार नाही. आणि या अस्ताव्यस्त विश्वाला एक ठराविक चौकट नाही. त्यामुळे चौकटीत राहिलं तर ठराविक गोष्टी घडणारच अशी खात्री नाही. उदाहरणार्थ एखादा बंडू इन्जिनीअर झाला आणि एखाद्या कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून लागला तर त्याला त्याच्या प्रवासाचा सरधोपट का होईना पण मार्ग माहित असतो. ट्रेनी इन्जिनिअर, सुपरव्हायजर, मॅनेजर, प्लांट मॅनेजर, जनरल मॅनेजर इत्यादींची शिडी ठरलेली असते. कलेच्या क्षेत्रात असं काहीच नसतं. तुमचा मार्ग तुम्हालाच आखायचा असतो. तुमची शिडी तुम्हालाच तयार करायची असते आणि आपली आपणच चढून बघायची असते. प्रत्येक वेळी शिडी चढल्यावर ती मोडणार नाहीच याचीसुद्धा खात्री नसते. किंबहुना कलेच्या क्षेत्रातली शिडी सातत्यानं चढत राहाण्याची असते.

प्रत्येक बंडू आणि बंडीच्या समोर हे सगळे विचार आणि त्यातून निर्माण होणारे गुंतागुंतीचे प्रश्न उभे ठाकत असतात. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अपरिचिताच्या प्रदेशात मुशाफिरी करायची त्यांची तयारी असते. पण अनेकदा बंडूच्या आई बाबांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच हवी असतात. बंडीच्या आई बाबांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच हवी असतात. त्यांच्या मनात त्यांची उत्तरं ठरलेली असतात. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची चिंता त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिल्यामुळे वाढलेली असते! तरुण बंडू किंवा बंडीच्या बेदरकारपणाची, तारुण्य सुलभ उत्साहाची भीती वाटत असते. आपला बंडू किंवा बंडी अपयशाच्या गर्तेत जाऊ नये याची स्वाभाविक काळजीही असते. नेमक्या याच वेळी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हा सुविचार अतिशय कुविचार वाटू लागतो. आपल्या बंडू किंवा बंडीच्या नशिबी अपयश अजिबात नको हा विचार मूळ धरू लागतो. बंडू पडला तर तो परत उठू शकेल का अशी चिंता वाटू लागते, किंबहुना  उठूच शकणार नाही याचीच जणू खात्री वाटत राहते.

इतर अनेक क्षेत्रातल्या उपद्व्यापी बंडूंचं आपण खूप कौतुक करतो. पण कलेच्या क्षेत्रातल्या बंडू बंडींना मात्र पुष्कळच जास्त कष्ट पडतात. ते एका दृष्टीनं चांगलंच आहे. स्वतःला तावून सुलाखून घ्यायला हा वेळ खूप कामी येतो. आयुष्यात पुढे येणाऱ्या अनेक प्रसंगांना तोंड द्यायचं बळ याच काळात मिळत असतं. पण अतिशय विश्वासानं पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं म्हणू इच्छित असलेल्या या बंडू-बंडीच्या पाठीत दणके  मिळण्याची शक्यता अधिक असते.

अश्या बंडूंना आणि बंडींना, त्यांच्या प्रयोगशीलतेला, त्यांच्यातल्या उद्योगीपणाला, त्यांच्यातल्या या कलात्मक उद्यमशीलतेला सकारात्मक, सजग प्रतिसाद देणं ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. बंडू-बंडीच्या आईबाबांची आणि आपल्या सगळ्यांची सुद्धा.

(समाप्त)

Friday, July 11, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (नऊ)

“तरीपण मला एक प्रश्न आहे...” बंडीचे ‘तरी पण’ काही संपत नव्हते.
“बोल.”
“मला असं सांगा की या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना कामंपण तशी एकसुरीच मिळतात. गोड गोड दिसायचं... गोड गोड हसायचं... लाडेलाडे बोलायचं... आणि हिरोच्या मागे मागे फिरायचं... मग याच्यामध्ये करिअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं...”
“तुला खरंच असं वाटतं?”
“होय. सगळ्याजणी तेच तर करीत असतात.”
“सगळ्या जणी म्हणजे कोण कोण?”
“सगळ्याच. कुठल्याही नटीचं नाव घ्या. ती हेच करते. आणि तिला हेच करावं लागतं.”
“असं? मग आता उदाहरण दे बघू.”
“अं...? कुठलंही नाव घ्या. काजोल, राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय... केवढी तरी उदाहरणं आहेत.”
“मी तुला काही सिनेमांची नावं विचारतो. ते तू पहिले आहेस का ते सांग. तू ‘कुछ कुछ होता है’ पहिला आहेस?”
“अर्थात. हा काय प्रश्न झाला... थिएटरमध्ये जाऊन सात वेळा पाहिलाय!”
“माय नेम इज खान?”
“कुठला?”
“माय नेम इज खान...”
“नाही.”
“हे राम...?”
“का? काय झालं?”
“झालं काही नाही. ‘हे राम’ हे सिनेमाचं नाव आहे. कमलहासनच्या. पहिलायस?”
“नाही.”
“प्रव्होक्ड?”
“नाही...”
“का बरं हे चित्रपट पाहिलेले नाहीत?”
“काय माहित... या सिनेमांची नावं पण ऐकलेली नाहीत.”
“बरं. सई परांजपेंचे किती सिनेमे पहिले आहेस?”
“त्यांचं नाव ऐकलंय अधूनमधून. पण त्यांनी कोणकोणत्या सिनेमात कामं केली आहेत ते नाही माहित.”
“त्या दिग्दर्शिका आहेत.”
“हो का... सॉरी हं... पण मला तसं नीटसं माहित नाहीये...”
“हे मात्र तुझं सगळ्यात खरं वाक्य आहे. ‘मला तसं नीटसं माहित नाहीये...’ पण तरीही सर्व प्रकारचे निष्कर्ष काढून तू मोकळी झाली आहेस नाही का?”
“म्हणजे?”
“म्हणजे गेल्या वेळी तुला असं वाटत होतं की सर्व मुलींना कास्टिंग काऊचवर जाण्याशिवाय पर्याय नाही. आज तुला असं वाटतंय की सगळ्या मुलींना एकसारखंच आणि वरवरचं काम असतं...”
“...पण म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये...”
“पण तसंच म्हणालीस की नाही आत्ता? या आपल्या डोक्यातल्या समजुती केंव्हा डोकं वर काढतील याचा नेम नसतो. हे बघ... जेंव्हा तू अभिनेत्री म्हणून काम करायचं ठरवतेस तेंव्हा सर्व प्रकारची कामं तुझ्या दिशेनं येणार. त्यातल्या कुठल्या कामाला होकार द्यायचा आणि कुठल्या कामाला नकार द्यायचा हे तूच ठरवायचं आहेस नाही का? यावर आपली अशीही एक समजूत असते की आपल्याला निवडीचा अधिकार नसतो. आपण नवीन असतो. आणि त्यामुळे जे मिळेल ते काम करावंच लागतं. पण हे खरं नाही. आपण स्वतःच असं ठरवतो की आपला निवडीचा आणि नाही म्हणण्याचा अधिकार वापरायचा नाही. आत्ता आपल्याला विचारलाय ना, मग आधी हे काम पदरात पाडून घ्या. आणि या शॉर्ट टर्म फायद्यासाठी आपण आपलं संपूर्ण करीअरच पणाला लावतो.”
“आता तुम्ही द्या पाहू असं उदाहरण ज्यानं किंवा जिनं करिअरच्या सुरुवातीच्या काळात कामाला नाही म्हटलं...”
“गांधी विरुद्ध गांधी हे नाटक पाहिलंयस? किंवा नाव तरी ऐकलं आहेस का?”
“पाहिलं नाहीये. पण नाव ऐकलंय. अतुल कुलकर्णी होता नं त्यात? त्यानं नटरंगमध्ये काय सॉलिड काम केलंय...”
“हं... पण कदाचित तो आपल्याला नटरंगमध्ये कधीच दिसला नसता. त्यानंच मागे एकदा बोलताना सांगितलं होतं की ‘गांधी विरुद्ध गांधी’ नंतर महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी त्याला असंख्य ऑफर्स येत होत्या. अगदी मेक अप करून स्टेजवर थोडावेळ येऊन जाण्यापासून ते सिनेमापर्यंतच्या. त्या सर्वांना त्यानं नकार दिला. लक्षात घे की ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे त्याचं पाहिलं व्यावसायिक नाटक होतं. तो नुकताच मुंबईत आलेला नवीन नट होता. आणि त्यालाही कामाची गरज होतीच... पण कामाची गरज आणि करिअरची आखणी यामध्ये गल्लत करून चालत नाही. त्या वेळी जर त्यानं त्या सर्व भूमिका स्वीकारल्या असत्या तर त्याला कदाचित भरपूर पैसे मिळाले असते. आणि कदाचित त्याच्यावर गांधींचं काम हातखंडा करणारा नट म्हणून शिक्का बसला असता. आणि तसं झालं असतं तर त्याचे नट म्हणून असलेले बहुरंग आणि बहुढंग - म्हणजे ‘व्हर्सटॅलिटी’ – आपल्याला कदाचित बघायलाच मिळाले नसते. त्यानं जेंव्हा त्या भूमिकांना नकार दिला तेंव्हा काही त्याला माहित नव्हतं की आपण पुढे यशस्वी होणार की अयशस्वी. पण करिअर म्हणून आपल्याला काय करायचं आहे याची पुरेशी स्पष्टता त्याच्या डोक्यात होती. सुरुवातीला बोलताना तू काही अभिनेत्रींची नावं घेतलीस. त्यांनीही काही चित्रपटांमधून त्यांच्या कुवतीची ओळख करून दिली आहे. आणि त्यांनी त्यांच्या करिअरविषयी काही निर्णय घेतले आहेत. त्यावर आपण घाईघाईनं व्हॅल्यू जजमेंट देण्याचं कारण नाही. त्यामुळे प्रत्येकाला एकाच विशिष्ट पद्धतीने निर्णय घ्यावे लागतात असं समजण्याचं कारण नाही. म्हणूनच मी अतुलचं उदाहरण दिलं.”
“पण तो पुरुष आहे. या क्षेत्रातल्या बायकांना असं करता येतं का...” आता बंडूलाही कंठ फुटला.
“किती नावं सांगू? सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस, कविता लाड, ज्योती सुभाष... अलीकडची नावं घ्यायची तर मृणाल कुलकर्णी, रसिका जोशी, विभावरी देशपांडे... यांच्यापैकी कुणीही फक्त हिरोच्या मागे धावलेलं नाही. खोटं खोटं दिसत आणि खोटं खोटं हसत आपलं स्त्रीत्व विकायला काढलेलं नाही. आपण निदान आपल्या स्वतःवर तरी विश्वास ठेवायला हवा. आणि आपलं आयुष्य नेहमी आपल्याच हातात असतं या गोष्टीवरही विश्वास ठेवायला हवा. आपण कसे वागतो यावर आपलं काय होणार हे अवलंबून असतं. प्रभा गणोरकर यांची एक कविता आहे,
‘आयुष्य आपल्याला फरपटत नेतं
हे खोटं आहे
कित्येकदा आपणंच आयुष्याचं बोट धरून त्याला भलत्या वाटेवर सोडून येतो.’
या दोन ओळी जरी लक्षात ठेवल्या तरी कितीतरी गोष्टी सुकर होऊन जातील.”  

(क्रमशः)     
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)


Saturday, June 28, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (आठ)

“ही माझी मैत्रीण...” बंडू.
“नमस्कार.” मी तिच्याकडे बघून म्हणालो. मनातल्या मनात मी तिचं नाव ठरवून टाकलं... बंडी!
“मला पण कलाक्षेत्रातच करिअर करायचं आहे. तुम्ही बंडूशी जे बोलता ते सगळं तो माझ्याशी येऊन बोलतो. पण माझे प्रश्न थोडेसे वेगळे आहेत... मी मुलगी आहे ना... त्यामुळे...”
“त्यामुळे काय...”
“आपण काय काय ऐकतो ना या सेलिब्रिटीजचं... म्हणजे मुलींशी नीट वागत नाहीत वगैरे... म्हणजे तुमच्या लक्षात येतंय न मला काय म्हणायचंय ते...”
“माझ्या लक्षात येतंय. आणि त्यामुळेच मी तुला काही प्रश्न विचारणार आहे.”
“तुम्ही मला प्रश्न विचारणार आहात? खरं म्हणजे मला प्रश्न आहेत आणि मला वाटत होतं की तुम्ही मला उत्तरं देणार आहात...”
“मी तुला जे प्रश्न विचारणार आहे त्यातूनच कदाचित आपल्याला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. चालेल?” मला या चुणचुणीत बंडीचं कौतुक वाटत होतं.
“चालेल.”
“मग माझा पहिला प्रश्न असा की मुलींशी नीट वागत नाहीत म्हणजे काय?” 
“म्हणजे... आपण वाचतो ना वर्तमानपत्रात... ते कास्टिंग काउच वगैरे...”
“मला असं सांग की मुलींना असे अनुभव फक्त कला क्षेत्रातच येतात का? इतर प्रकारच्या उद्योग व्यवसायात असणारी सर्व मंडळी अत्यंत सज्जन असून सर्व दुर्जन मंडळी कलाक्षेत्रातच आहेत अशी स्थिती आहे का?”
“नाही नाही... मला तसं नाही म्हणायचंय पण आपण ऐकतो ते बहुतेक वेळा कलाक्षेत्रातल्या लोकांबद्दलच ऐकतो ना...” 
“तू मघाशी वापरलेला शब्द इथे अतिशय महत्वाचा आहे. ‘सेलिब्रिटीज’. आपल्याला जे वर्तमानपत्रातून किंवा टी.व्ही.वरून जे ऐकायला मिळतं ते या सेलिब्रिटीजबद्दल असतं. कारण ते ऐकण्यामध्ये आपल्या लोकांना रस असतो. एखाद्या नामवंत कलाकाराची काळी बाजू दिसली तर आपल्याला ती बघायची असते. चघळायची असते. तुझ्या गल्लीत राहणाऱ्या पुरुषानं त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी गैरवर्तन केलं तर ते तुला माहित असण्याची शक्यता किती? नगण्य! पण हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एखाद्या दिग्दर्शकाविषयी अशी अफवा जरी निर्माण झाली तरी ती तुला माहित असण्याची शक्यता खूपच वाढते नाही का?”
“म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की हा सगळा मिडीयाचा हाईप असतो... प्रत्यक्षात असं काही सुद्धा होत नाही...”
नाही. प्रत्यक्षात असं काहीसुद्धा होत नाही असं मी अजिबात म्हणू इच्छित नाही. पण या गोष्टी सर्वच क्षेत्रात घडत असतात. आणि इतर क्षेत्रात त्या जशा घडतात तश्याच त्या कलाक्षेत्रातही घडतात. पण कलाक्षेत्र हे प्रसिद्धीचं क्षेत्र आहे. ग्लॅमरचं क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात घडणाऱ्या वाईट गोष्टींनाही भरपूर प्रसिद्धी मिळते. अनेकदा सवंग प्रसिद्धीसाठीसुद्धा अशा अफवा पसरवल्या जात असतात.”
“पण म्हणजे तुम्ही असं म्हणताय की इतर क्षेत्रातही असं होतं...”
“प्रकार वेगवेगळे असतील, पण जिथे जिथे विवेकबुद्धी हरवून बसलेले पुरुष काम करत असतात, तिथे तिथे स्त्रियांचं शोषण होण्याची शक्यता असतेच.”
“पण मग कलाक्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या माझ्यासारख्या मुलींनी काय करायचं...”
“खंबीर राहायचं घाबरायचं नाही. आपल्या मनाविरुद्ध काहीही करायला आपल्याला कुणीही भाग पडू शकत नाही यावर विश्वास ठेवायचा.”
“पण मुलींना असं केल्याशिवाय पर्यायच नसतो असंही म्हणतात...”
“कला क्षेत्रात नाव कमावलेल्या, आपला ठसा उमटवलेल्या स्त्रियांची संख्या काही कमी नाही. त्या सर्वांनी हाच मार्ग चोखाळला असेल असं तुला वाटतंय का? आजपर्यंत संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, अशा विविध कलाक्षेत्रांत अनेक कलावतींनी अफलातून काम करून ठेवलं आहे. त्या सर्वांनी कास्टिंग काउचवर सुरुवात केली असं तुला वाटतंय? त्यांच्या अंगी असलेल्या कलेचं त्यांनी घेतलेल्या अपरंपार कष्टांचं मोल काहीच नाही?”
“नाही तसं नाही. पण त्या लकी होत्या... आणि त्यांच्यापाशी टॅलेंटपण होतं...”
“आणि तुझ्यापाशी ते नाही? मग तू या क्षेत्रात येण्याचं कारणच नाही. माझ्यामध्ये टॅलेंट आहे यावर माझा विश्वास आहे की नाही यावर मी माझं करिअर कसं घडवणार ते ठरतं... आणि त्या लकी होत्या म्हणजे काय? त्यांना कष्ट न करता सगळं मिळालं का?”
“नाही. पण त्यांच्या कष्टाचं फळ देणारी माणसं त्यांना मिळत गेली.”
“मग?”
“तशी मला मिळाली नाहीत तर?”
“पण तशी तुला मिळतील की नाही हे तुला तू कष्ट केल्याशिवाय कसं कळेल? त्यांना कुणी यशाची हमी दिलेली नव्हती. त्या कलेची साधना करत गेल्या. कष्ट करत गेल्या. ‘त्याचं ते नशीब आणि आपले ते स्वकष्ट’ हे कसं काय बरं चालेल?”
“पण मग मुलींना या क्षेत्रात येण्यापासून का बरं रोखलं जातं?”
“कारण आपल्याला खात्री नसते. ‘कशाला हवी विषाची परीक्षा’ असा विचार असतो. आणि ‘मुलीला शेवटी लग्न करून नवऱ्याच्या घरीच तर पाठवायचंय, ते झालं की आम्ही सुटलो’ हा बहुसंख्य पालकांचा विचार असतो! मग कला बिला आपली लग्न जमवताना एक ‘प्लस पॉइंट’ म्हणून ठीक आहे. करिअर वगैरेची भानगड नकोच! मुळात मुलींच्या करिअरविषयी एक सामाजिक अढी आपल्याकडे आहे. त्यातून कलाक्षेत्रात करिअर म्हणजे अजूनच प्रॉब्लेम... त्यापेक्षा नकोच ते... मुलींना घाबरवून ठेवा. म्हणजे प्रश्न मिटला.”
“पण समजा अशी अयोग्य मागणी कुणी केली तर? मग मुलगी काय करणार? करिअरमधला पुढचा टप्पा गाठायला कदाचित तसं वागावं लागू शकतं आणि त्यावेळी तर समोर पर्यायच नसतो...”
“नाही म्हणायचा पर्याय नेहमीच खुला असतो! अशा वेळी नाही म्हटल्यामुळे करिअरमधला पुढचा टप्पा गाठायला कदाचित अजून थोडा वेळ लागेल. पण त्यानं काहीच फरक पडत नाही. ‘अति घाई, संकटात नेई’ अशी पाटी आपण हायवेवर नेहमी वाचतो. आपल्याला आपल्या करिअरच्या पाउलवाटेवरून हायवेवर जायचं असलं तर ‘अति घाई, संकटात नेई’ ही पाटी कधीच विसरून चालणार नाही.”
(क्रमशः)     

(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)

Monday, June 23, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (सात)

“मला वाटतं की आपण एकूणातच कला या गोष्टीला फार लाईटली घेतो. कला म्हणजे मनोरंजन या कल्पनेशी आपण थांबतो आणि कलेचा विचार गांभीर्यानं अजिबात करत नाही.” इति बंडू.
“अभिनंदन. आज तू खरंच विचार करून आलायस बंडू. पण मला असं सांग की कला म्हणजे मनोरंजन नाहीये?”
“आहे ना. पण कला म्हणजे ‘नुसतंच’ मनोरंजन नाही.”  
“मग?”
“त्यात एक विचार पण आहे.”
“पण म्हणजे नेमकं काय?”
“म्हणजे असं की... मला वाटतं की कला म्हणजे मनोरंजन आहे पण ते बिनडोक मनोरंजन नाही.”
“अरे वा... आज तू खूपच विचार करून आलेला दिसतोयस.”
“होय... म्हणजे तसं वाटतंय खरं... तर कलेमध्ये जर डोकं पण वापरता आलं तर कलाकाराला तर मजा येतेच पण त्याबरोबरच त्या कलेचा आस्वाद घेणा-याला पण येते.”
“उदाहरण दे बघू...”
“उदाहरणार्थ एखादा विनोदी नट आपल्या अंगभूत टायमिंग साधण्याच्या कौशल्यामुळे हशा वसूल करतो. प्रेक्षक हसतात. पण तो पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीनं टायमिंग केंव्हा साधू शकेल? जेव्हा तो आपल्या पहिल्या अनुभवाची चिरफाड करेल तेंव्हा. ही चिरफाड करणं फार काही जिकिरीचं असतं अशातला भाग नाही. पण त्यासाठी थोडंसं स्वतःच्या आत डोकावून बघावं लागेल. आणि त्याच वेळी बाहेर होत असलेल्या परिणामांकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल.”
“उत्तम. तू तुझं पुस्तक लिहायला सुरुवात केली आहेस असं म्हणायला हरकत नाही. शाब्बास. मग आता प्रश्न कुठे आहे?”
“प्रश्न असा आहे की कला शिक्षण घेतल्यामुळे या गोष्टी कशा करायच्या ते शिकता येतं का? आणि असं शिकवणं आणि शिकणं खरोखरंच शक्य आहे का?”
“हं. हा प्रश्न आहे खरा. बंडू, तू कधी दामू केंकरे यांचं नाव ऐकलं आहेस का?”
“नाव ऐकलं आहे पण ते खूपच सिनिअर होते ना... त्यामुळे त्यांचं काही काम पाहिलेलं नाही.”
“हरकत नाही. हल्लीच्या काळात नाव ऐकलं आहेस हेसुद्धा खूप आहे. दामूकाका अप्रतिम आणि अफलातून दिग्दर्शक होते. मुख्य म्हणजे त्यांच्या काळात जे काही विचारपूर्वक नाटक करणारे आणि तरीही मनोरंजनाला बाजूला न सारणारे मोजके दिग्दर्शक होते त्यांचे दामूकाका अध्वर्यू. त्यांनी एकदा बोलताना कलाशिक्षणाविषयी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली होती. ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकवायला जात असत. त्यांच्या पहिल्या लेक्चरची सुरुवात ते नेहमी एकाच वाक्यानं करीत असत. ‘कला ही शिकवता येत नाही...’ या वाक्यानंतर वर्गातले विद्यार्थी अचंब्यात पडत. सर्वांना वाटे की अरे... आपण तर इथे कला शिक्षण घ्यायला आलो आहोत. जे.जे. सारख्या नामांकित कला महाविद्यालयात आलो आहोत. आणि पहिल्याच तासाला हा मनुष्य हे काय सांगतोय... मग दामूकाका त्यांच्या वाक्याचा उत्तरार्ध पूर्ण करीत, ‘... पण कला ही शिकता येते. कला ही शिकवता येत नाही, पण ती शिकता येते!’ त्यांनी हे जेंव्हा मला सांगितलं तेंव्हा मी त्यांना विचारलं की मग शिक्षक म्हणून कला शिक्षकानं काय करायला हवं? काय करणं अपेक्षित आहे? त्यावर ते म्हणाले, “शिक्षकाची जबाबदारी फारच मोठी आहे. वर्गातल्या ज्या विद्यार्थ्याला शिकायचं आहे त्याला शिकता येईल अशी परिस्थिती वर्गात निर्माण करीत राहणं हे शिक्षकाच्म कौशल्य आहे!’ म्हणजेच ‘हे मी शिकवतो आहे’ असा विचार न करता ‘काय केले असता ज्याला शिकायचे आहे त्याला शिकता येईल’ हा विचार कलाशिक्षकाने करणे अतिशय महत्वाचे आहे. शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्याला अधिकाधिक सकस अनुभवांचे खाद्य पुरविणे ही चांगल्या कला शिक्षकाची जबाबदारी आहे.”
“पण मग सर्व कलाशिक्षण संस्थांमध्ये असा विचार करणारे किंवा असा विचार माहित असणारे शिक्षक असतात का?”
“दुर्दैवानं नसतात.  आणि त्याहीमुळे अनेकदा कला शिक्षणावरचा विश्वास उडत जातो. कला शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या सर्वांनाच हे शिक्षण कुठे घ्यावे असा प्रश्न भेडसावत असतो. आणि मग अशी जागा न समजल्यामुळे कला शिक्षणाकडे दुर्लक्ष करून नशीब आजमावण्याकडे कल वाढतो. आणि मग त्यातूनच ‘कुणीतरी गॉडफादर हवा’ किंवा ‘एक ब्रेक मिळायला हवा’ अशी वाक्यं तयार होत जातात. या वाक्यांमध्ये ‘मी करण्यासारखे काही नाही. सारे काही इतरांच्या हाती आहे’ हा मूळ अर्थ असतो. म्हणजे माझ्या निर्णयाची जबाबदारी मुळातच इतरांवर ढकलायला मी मोकळा. आणि यातून स्वतःला प्रश्नही विचारायला लागू नयेत म्हणून ‘या क्षेत्रात असंच असतं’ असं म्हणत मी माझं समाधानही करून घेऊ लागतो.”
“मी आपल्या आधीच्या गप्पांमध्ये उच्चारलेली जवळ जवळ सगळी वाक्यं तुम्ही नीटच खोडून काढली आहेत...”
“पण मुद्दा तुझी वाक्यं खोडण्याचा नाही. तर कलाशिक्षणाकडे विद्यार्थ्याने आणि कला शिक्षकाने कसे पाहावे हा आहे. अनेक कला शिक्षक असेही असतात की ज्यांना खरं म्हणजे यशस्वी कलाकार म्हणून नाव मिळवायचं असतं. विविध कारणांमुळे ते साध्य झालेलं नसतं. मग नाईलाज म्हणून ते शिक्षक होतात. आणि तिथेच सगळा घोटाळा होतो. कारण आता स्वतःच्या अपयशाची जबाबदारीही झटकायची असते आणि त्याच वेळेला कलाकार म्हणून मोठेपणाही हवा असतो. शिक्षक म्हणवून घ्यायची तयारी नसते आणि प्रत्यक्षात मात्र रोजच्या रोज शिकवण्याचंच काम करावं लागतं. या सगळ्या गदारोळात ना स्वतःचे भले होते न विद्यार्थ्याचे.”
“पण मग ज्याला मनापासून शिकायची इच्छा आहे त्याने काय करावे?”
“डोळे उघडे ठेवून निर्णय घ्यावेत. जिथे शिकायला जायचे असेल तिथला अभ्यासक्रम काय आहे ते पाहावे. तिथे शिक्षक कोण आहेत ते पाहावे. हे शिक्षक नाईलाजाने झालेले शिक्षक नाहीत न हेसुद्धा तपासून पाहावे. अशा अनेक संस्थांमध्ये मार्केटिंगच्या हेतूने अनेक नामांकित कलावंतांची यादी ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ म्हणून दिली जाते. अशी मंडळी एक दोन तास जरी येऊन गेली किंवा एखादा दिवस येऊन गेली तरी ती ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ असतात! तिथे नियमितपणे कोण शिकवणार आहे? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? ते स्वतः प्रशिक्षित आहेत का? ते फावल्या वेळात शिकवतात की शिकवणे हा त्यांचा मूळ उद्योग आहे? या सर्व गोष्टी बघायला हव्यात. आणि या सर्व गोष्टींची उत्तरे मिळाल्यावर डोळे उघडे ठेवून निर्णय घेणे आवश्यक ठरते.”
“हं... म्हटलं तर सोपं आहे... म्हटलं तर अवघड आहे...”
“म्हणून तर मी अगोदरच म्हटलं होतं की एकदम आयुष्यविषयक बोलण्यापेक्षा एकेक मुद्दा धरून बोलूया...”

(क्रमशः)     

(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)

Wednesday, June 18, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (सहा)

“मला वाटतंय, म्हणजे तूर्तास तरी माझं ठरलंय की मला कलाक्षेत्रातच करिअर करायचं आहे. आणि ते पण अभिनयातच. म्हणजे माझं ध्येय मी ठरवलंय असं आपण म्हणू शकतो.” इति बंडू.
“व्हेरी गुड. आता मला असं सांग की अभिनय करणं ही तुझी गरज आहे असं तुला वाटतं का? आणि वाटत असेल तर तसं का वाटतं?” मी.
“मला माहीतच होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार. आणि त्यामुळे मी त्याचाही विचार केलाय. माझं उत्तर आहे, ‘होय. अभिनय करणं ही माझी गरज आहे.’ तशी ती गरज का आहे याचं उत्तर शोधायला मला जरा कष्ट पडले, पण मला वाटतंय की माझ्या हाती काहीतरी लागलय.” बंडू. 
“मग सांग बघू काय ते...” मी.
“मला असं वाटतं की मला काहीतरी म्हणायचंय. पण म्हणजे नुसतं भाषण द्यायचं नाहीये. मला जे वाटतं ते इतरांना सांगण्याची मला अतिशय उत्सुकता असते. आणि एवढंच नाही तर मला त्यावर इतरांची प्रतिक्रिया पण हवी असते. आणि गम्मत म्हणजे मला जे सांगावसं वाटतं ना, ते काही दर वेळी उपदेशपर किंवा माहितीपरच असतं असं नाही बरं का. काही वेळा एखादा ललित लेख वाचल्यावर मनात येणारे विचार किंवा एखादी कविता वाचताना येणारा अनुभव यांसारख्या गोष्टीपण असतात. आणि मग हा अनुभव सांगण्यासाठी फक्त शब्द पुरे पडत नाहीत. काही गोष्टी प्रत्यक्ष करून दाखवाव्यात असं वाटतं. वर्तमानापत्रामधली एखादी बातमी वाचल्यावर प्रचंड संताप येतो. हा संताप व्यक्त करण्यासठी भाषण काय देणार? मी संतापलो आहे असं सांगणार का...? पण मी जर अभिनय करत असेन तर मी संतापलो आहे हे न बोलता सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. कदाचित केवळ एखादा लुक किंवा मानेची किंचितशी हालचाल त्यासाठी पुरेशी ठरेल. आणि स्वतःला अशा पद्धतीनं व्यक्त करणं ही माझी गरज आहे...”
“व्वा! तू आज खूपच विचार करून आलेला दिसतोयस...”
“हो मग...! तुम्ही एवढे दिवस इतक्या गोष्टी सांगताय आणि इतके प्रश्न विचारताय की मला विचार करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.”
“हं. मग आता पुढची पायरी काय आहे?”
“आता हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरु करणे ही पुढची पायरी आहे. आणि या पायरीपाशी मी जरा अडलेलो आहे.”
“का बरं?”        
 “कारण प्रयत्न म्हणून मला जे काही सुचतंय ते तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे मी काय करणार यापेक्षा इतरांनी काय केलं पाहिजे या दिशेनं जास्तं जातंय.”
“पण तू करू शकतोस अशी कोणती गोष्ट आहे?”
“वाचन. मी वाचन करू शकतो!”
“अरे? मागच्या वेळेला तर तू माझ्याशी वाद घालत होतास की सारखं सारखं काय वाचायला सांगता म्हणून...”
“हो... पण ते करावंच लागणार हे मला नीट कळलंय!”
“अजून काय करायला हवं सांग बघू...”
“तेच तर कळत नाहीये. अजून अनुभव घ्यायला हवा. पण अनुभव घ्यायचा म्हणजे कुणीतरी मला नाटकात घ्यायला पाहिजे. म्हणजे पुन्हा सगळं इतर कुणावरतरी अवलंबून...”
“पण अनुभव घेण्यासाठी अन्य कोणतेच मार्ग नाहीत का?”
“नाहीत ना...”
“का बरं? तू रीतसर एखाद्या नाट्य विद्यालयात जाऊ शकतोस. किंवा एखाद्या विद्यापीठाच्या
नाट्य विभागात प्रवेश घेऊ शकतोस.”
“छे... अभिनय असा शिकवता येतो असं मला नाही वाटत! अभिनय असा शिकवणं शक्यच नाही.”
“का बरं...?”
“का म्हणजे काय? नट हा जन्मजात नट असतो! नट हा जन्मावा लागतो... तो असा शिकवून वगैरे तयार करता येत नाही काही...!”
“असं? मला सांग बंडू... या जगात तुला दुसरं काहीही करायचं असलं तर तुला त्याचं रीतसर शिक्षण घ्यावं लागतं. उद्या अचानक दवाखाना सुरु करून म्हणशील का की आता मी इतरांवर उपचार करायला सुरुवात करतो म्हणून? किंवा काहीही शिक्षण न घेता तुला वकील, इंजिनिअर, सी.ए., एम.बी.ए. यातलं काहीतरी होता येतं का?”
“अं... नाही... पण...”
“पण काय?”
“पण म्हणजे या गोष्टींमध्ये फरक आहे.”
“असा कुठला फरक आहे ज्यामुळे तुला असं वाटतं की कला ही काही शिकण्याची गोष्ट नाही? आणि विशेषतः अभिनयात असं काय आहे की जे न शिकता येऊ शकतं? इतर प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं. कलेमध्ये सुद्धा नृत्य, संगीत शिक्षण घेतल्याशिवाय येत नाही. एखादा मुलगा किंवा मुलगी असं अचानक जाहीर करू शकतं का की मी आता गाण्यात करिअर करणार आहे आणि पुढच्या महिन्यात माझी मैफल आहे? किंवा मला भरतनाट्यम फार आवडतं आणि मी आता पुढच्या महिन्यात अरंगेत्रम करणार आहे? त्यासाठी काही वर्ष शिकावं लागेल हे आपण मान्य करतो. मग अभिनयामध्ये असं काय आहे की ज्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की हे मला न शिकता सुद्धा येऊ शकेल? अभिनय म्हणजे फक्त स्वच्छ बोलता येणं आणि मला बोलता येतंच, त्यामुळे मला अभिनय येतोच! मग शिकायचं काय त्यात असं वाटतंय का तुला?”    
“अं... मी याचा असा विचार केलाच नव्हता...”
“मग आता कर. कलेचा ध्यास घ्यावा लागतो, कलेची साधना करावी लागते वगैरे सगळं आपण म्हणतो, पण कलेचं, आणि विशेषतः अभिनयाचं, शिक्षण घेण्याची कल्पना आपल्याला पटत नाही. असं का बरं होतं?”
“अं... मी याचा खरंच विचार केला नव्हता. मला अजून थोडा वेळ लागेल या विषयावर माझं मत मांडायला.”
“हरकत नाही. हवा तेवढा वेळ घे. आपल्याला काहीच घाई नाही. अति घाई, संकटात जाई हे फक्त हायवेवरच लक्षात ठेवायचं असतं असं नाही काही! आयुष्यातही अति घाई, संकटात जाई हे लक्षात ठेवायला हवं! जेंव्हा तू म्हणशील तेंव्हा पुहा भेटूया!”

(क्रमशः)     
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स) 

Sunday, June 15, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (पाच)

“तेंव्हा थोडक्यात काय बंडू, तर आपण आपल्या प्रगतीचा विचार कसा करतो यावर आपण करिअरचा विचार कसा करणार ते ठरत जातं.”
“पण जर करीअरच ठरलेलं नसेल तर प्रगतीचा विचार कसा काय करणार? ते आधी ठरवायला नको का?”
“बरोबर. आणि त्यासाठीच तर आपली बडबड चालू आहे! प्रश्न असा आहे की मला काय करायचं आहे हे ठरवताना मी काय काय विचार करत असतो?”
“मी असा विचार करतो की मला अभिनयात करिअर करायचं आहे. मग त्यासाठी मला कुठेतरी ब्रेक मिळायला पाहिजे. कुणीतरी दर्दी कलावंतानं माझ्यातले कलागुण हेरून मला संधी द्यायला पाहिजे. किंवा कुणीतरी माझ्यापाठीमागे गॉडफादर म्हणून उभं राहिलं पाहिजे. निदान मला एखाद्या युवा दिग्दर्शकानं तरी मला त्याच्या एखाद्या नाटकात महत्वाची भूमिका द्यायला पाहिजे...”
“बंडू, तू आत्ता जे बोललास त्या प्रत्येक वाक्याचा अर्थ ‘तुझ्या करिअरसाठी इतर कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे’ असा होतोय नाही का? कुणीतरी मला संधी दिली पाहिजे... कुणीतरी गॉडफादर झालं पाहिजे... कुणीतरी भूमिका दिली पाहिजे... इतर कुणीतरी असं काहीतरी केलं पाहिजे की मला फारसे किंवा अजिबातच कष्ट न करता सुग्रास भोजन मिळालं पाहिजे... अच्युत वझे नावाच्या एका लेखकानं लिहिलेलं एक नाटक आहे. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक...’ नाही नाही. ते बालनाट्य नाहीये. त्यातल्या हीरोचं नाव आहे ‘वांधेकर’. हा वांधेकर सारखा म्हणत असतो, ‘कॅत्री केलं पॅजे’... काहीतरी केलं पाहिजे... आणि त्याला लगेच पुढचा प्रश्न पडतो की ‘कॅ ब्र करावं?’... काय बरं करावं? या दोन वांझ विचारांच्या कात्रीत सापडलेलं ते पात्र आहे. ते नाटक एकदा मिळवून वाच!”
“वांधेकर... फार डेंजर नाव आहे हे... वांधेकर...”
“भिऊ नकोस. तुझा अजून तरी वांधेकर झाला नाहीये. आपला मूळ प्रश्न असा आहे की मला काय करायचं आहे हे ठरवताना मी काय काय विचार करत असतो...”
“मला कळत नाहीये की मी खरच विचार करत असतो की नुसताच डे ड्रीमिंग करत असतो... विचार करणं आणि स्वप्नरंजन यातला फरकच कळेनासा होतोय मला.”
“होतं असं कधी कधी. करिअर वगैरेच्या दिशेनं आपण नंतर जाऊ. पण कशातही करिअर करायचं म्हटलं तरी आपल्याला काही टप्पे पार करावे लागतात. त्यातला पहिला टप्पा म्हणजे स्वतःचे ध्येय स्वतः ठरविणे.”
“ध्येय. फार मोठा शब्द आहे हो हा... ध्येय...”
“पण त्याला आपण घाबराण्याचं कारण नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं ध्येय स्वतःच ठरवायचं. इतर कोण काय म्हणताय त्यावर स्वतःचं ध्येय ठरवता येत नाही. किंवा ठरवलं जाऊ शकतं पण मग कदाचित ते स्वतःचं ध्येय राहत नाही. तू अभिनय करायचा म्हणतोस ते का बरं? कुणीतरी तुला सांगितलं कि तुला हे जमेल म्हणून, की तुला खरोखर तसं वाटतंय?”
“पण नुसतं ध्येय ठरवून काय उपयोग..?”
“काहीच नाही. त्यामुळे ‘ध्येय ठरविणे’ हा फक्त पहिला टप्पा झाला. आता यानंतर स्वतःला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा की हे ध्येय सध्या करणे ही माझी गरज झाली आहे का? ‘आपले ध्येय सध्या करण्याची गरज भासणे’ ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अशी गरज जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने एकही पाउल टाकण्याची शक्यता नाही. अभिनय करणे ही तुझी गरज झाली आहे का याचा विचार कर. आणि अभिनयाच्या बाबतीत अजून एक महत्वाचा प्रश्न. अभिनय करणे ही तुझी गरज आहे की प्रसिद्धीचं, ग्लॅमरचं आकर्षण आहे हे सुद्धा तपासून बघायला हवं. एकदा हे ध्येय साध्य करण्याची गरज निर्माण झाली की ‘त्यासाठी प्रयत्न करणे’ ओघानेच आले. हे प्रयत्न करत असताना आपण ‘यशापयशाचा अंदाज घेणे’ हा पुढचा टप्पा. हा अंदाज का घ्यायचा? तर त्यामुळे आपल्या वाटेत असणारे अडथळे आपल्याला दिसू लागतात. आणि लक्षात ठेव, हे अडथळे जसे परिस्थितीमधले असू शकतात तसेच ते आपल्या आतूनही येणारे असू शकतात.”
“आपल्या आतून म्हणजे...?”
“म्हणजे आपल्याला विचार करण्याच्या पद्धतीमधून. या ‘अडथळ्यांवर मात’ करण्यासाठी आपल्याला काही वेळा मदत मागावी लागते. आता ‘मदत मागणे’ म्हणजे कमीपणा असं जर मला वाटत असेल तर मी माझ्यासाठीच अडथळा निर्माण करतो, नाही का? हा आपणच आतून निर्माण केलेला अडथळा! आणि मग या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम काय असतो ते सांग पाहू...”
“यश! निर्भेळ यश!” बंडू.
“किंवा अपयश! निर्भेळ अपयश!” मी.
“पण अपयश आलं तर मग काय उपयोग?” बंडू बावरून म्हणाला.
“शाळेत आपण सुविचार वाचतो की ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’...! पण प्रत्यक्षात मात्र मला ती पायरी गाळून वरती उडी मारायची असते. असं कसं काय जमेल बुवा?”
“”पण मग ‘अपयशी’ असा शिक्का नाही का बसणार?”
“बसेलही कदाचित. पण केंव्हापर्यंत? असं निर्भेळ अपयश आलं तर आपण काय करायला हवं? या अपयशाचा अभ्यास करायला हवा. आपलं कुठे चुकलं ते तपासायला हवं. त्यातून शिकायला हवं आणि पुन्हा पहिल्यापासून कामाला लागायला हवं. तर तू म्हणालास तो शिक्का पुसायला काही फार अवधी लागणार नाही.”
“हे करिअर प्रकरण फारच अवघड आहे.”
“म्हटलं तर अवघड आहे. म्हटलं तर सोपं आहे. तू काय म्हणायचं ठरवतोस त्यावर बरंच काही अवलंबून आहे. करिअरसुद्धा!”

(क्रमशः)     
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)

Thursday, June 12, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (चार)

“आपल्याला नक्की काय करायचं आहे हे कसं ओळखायचं?”
“चांगला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर भल्याभल्यांना आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत मिळत नाही. आणि अनेकदा माणसं निवृत्त होताना आपल्याला खरं म्हणजे काय करायचं होतं याचा पाढा वाचतात. म्हणजे एखादा आय.ए.एस. सर्व्हिसमधून निवृत्त झालेला अधिकारी म्हणतो, ‘खरं म्हणजे मला लेखक व्हायचं होतं.’ एखादा निवृत्त न्यायाधीश म्हणतो, ‘मला खरं तर चित्रकार व्हायचं होतं.’ आणि अनेकदा हे आपण ओळखलेलं नसतं असं नाही बरं का. पण जे आपण ओळखलेलं असतं ते उच्चारायची आपल्याला भीती वाटत असते.”
“पण गेल्या काही दिवसांत तुमच्याशी बोलल्यावर मी खूप विचार करतो आहे. आणि मला हा प्रश्न फारच सतावतो आहे की मला खरंच काय करायचं आहे. मला खरंच अभिनयात करिअर करायचं आहे का? की मला एम.बी.ए. करायला जास्त आवडणार आहे? की मला सायकॉलॉजीमध्ये एम.ए. करायला आवडेल? आणि तरी हा विचार मनात चालूच राहतो की पण खरं म्हणजे मला अभिनयच करायचा आहे...”
“हं... त्याचं काय आहे, की लहानपणापासून आपले बहुतेक सगळे निर्णय इतर कुणीतरी घेतलेले असतात. आणि त्यामुळे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी आपल्यावर कधी नसतेच! अगदी शाळेत असताना सुद्धा असंच होत असतं. आपण कुठले विषय शिकायचे ते ठरलेलं असतं. दहावीनंतर काय करायचं याचा निर्णय वरकरणी जरी आपण घेत असलो तरी प्रत्यक्षात आपण घेतो का हे तपासून बघायला हवं. भरपूर टक्के असले की सायन्स... थोडे कमी असले तर कॉमर्स, आणि त्याहूनही कमी असले तर आर्ट्स! अर्थात यालाही काही अपवाद असतातच. पण ते अपवादच असतात! जितके लाख विद्तार्थी या परीक्षेला बसतात त्या संख्येच्या तुलनेनं ही संख्या फारच नगण्य असते. पुढे बारावी झाल्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंगची भुतं आपल्यापुढे नाचत असतात. कॉमर्स आणि आर्ट्सवाल्यांना या टप्प्यावर फारसं काही करावं लागतं नाही. पण नंतर पुढच्या प्रवेश परीक्षा सुरु होतात. एम.बी.ए... लॉ... परदेशी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा... आपलं सगळं आयुष्य कॅट, सॅट, मॅट, जीमॅट अशा अनेक शॉर्टफॉर्ममुळे व्यापून जातं. आणि हे सर्व निर्णय आपले आई-वडील, इतर नातेवाईक, हितचिंतक आणि मित्रमंडळी या सगळ्यांच्या सर्वसहमतीने घेतले जातात. या सर्वसहमतीच्या भानगडीत आपल्याला स्वतःला नक्की काय करायचं आहे हा प्रश्न बाजूला पडतो. आणि या सर्व निर्णयांची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर नसल्यामुळे त्यांच्या परिणामांचीही जबाबदारी आपण घेत नाही. निर्णय योग्य ठरला तर ‘परमेश्वराची कृपा’ आणि चुकीचा ठरला तर ‘मला योग्य वेळी चांगला गाईडन्स मिळाला नाही’ असं म्हणायला मी मोकळा.”
“पण मग आता...”
“आता काय... आता निर्णय घ्यायचा. निर्णय घेण्यापूर्वी आपल्या दृष्टीनं सर्व बाजूंचा विचार करायचा. आणि मुख्य म्हणजे आपल्या निर्णयाची जबाबदारी आपणच घ्यायची. जास्तीत जास्त काय होईल? आपला निर्णय चुकेल...”
“पण मग तेवढा वेळ वाया नाही का जाणार?”
“वाया जाईल का? मी जे करायचं ठरवलं ते करण्यात मी अयशस्वी झालो तर माझा वेळ वाया जातो का? की माझं थोडं अधिक शिक्षण झालेलं असतं? आपल्याला जे साध्य करायचं आहे ते करायला अजून थोडं चालावं लागेल. पण आपण जे करतो आहोत ते आपल्याला करायचं आहे की नाही हे कळायला तर मदत होईल की नाही?”
“हो... पण आजच्या आधुनिक आणि वेगवान जगात असा वेळ घालवायचा म्हणजे...”
“जे आपल्याला करायचंच नाही ते आयुष्यभर केल्यानंतर आणि साठी उलटल्यानंतर ‘मला खरं म्हणजे वेगळंच आयुष्य काढायचं होतं’ असं म्हणण्यापेक्षा आत्ताच थोडा जास्त वेळ घेतला तर काय हरकत आहे...?”
“नाही... हरकत नाही... पण...”
“पण स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायची भीती वाटते! जोपर्यंत आपण या भीतीवर मात करत नाही तोपर्यंत आपण आपल्याकडून फारश्या अपेक्षाही ठेवू शकत नाही. मी आयुष्यभर अत्यंत भित्रेपणानं वावरणार आणि आयुष्यभर ‘मी जर अमुकतमुक क्षेत्रात असतो ना तर कुठच्या कुठे गेलो असतो’ असं सांगण्यात सगळा वेळ घालवणार...”
“पण असा निर्णय धाडकन घ्यायचा म्हणजे अवघडच आहे...”
“सोप्या गोष्टी कुणीही करेल नाही का? आणि धाडकन वगैरे काही नाही. भरपूर वेळ घे. आयुष्य ही काही घाईघाईनं संपविण्याची गोष्ट नाही.”
‘हं... “ बंडूनं दीर्घ सुस्कारा टाकला आणि शून्यात नजर लावली. मी त्याला त्याच्या विचारात सोडून चहा करायला स्वयंपाकघराकडे वळलो.
(क्रमशः)
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)